प्रतिनिधी : मुंबई.
अभिनेते ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली आहे (Rishi Kapoor demand to open liquor shop).
मुंबई : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. अशातच अभिनेते ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली आहे (Rishi Kapoor demand to open liquor shop). कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ऋषी कपूर म्हणाले, “सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा.”
याआधीही दारुची दुकानं सुरु ठेवण्याची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. मात्र, न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. तसेच याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेच्या नावावर व्यक्तिगत इच्छा मांडल्या आणि न्यायालयाचा वेळ वाया घालावल्याचा ठपका ठेवत दंडही केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, केरळ आणि पंजाब राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात दारुचा समावेश आवश्यक गोष्टींमध्ये केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांनी या निर्णयामागील कारणही स्पष्ट केलं. ते म्हणाले, “या विशेष परिस्थितीत राज्यात या उपाययोजना करणं गरजेचं आहे. असं असलं तरी नागरिक एकमेकांपासून अंतर ठेवतील यावर लक्ष ठेवलं जाईल. पंजाबमध्ये देखील दारुसह इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध असणार आहेत.”
असं असलं तरी केरळमधील कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित जिल्हा कासरगोड येथे दारुवर बंदी आहे. या जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक 38 रुग्ण सापडले आहेत. इतर ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरु राहतील असं सांगण्यात आलं आहे.